हरियाणात ‘हॅट्रिक’, महाराष्ट्रात बळ!

हरियाणात ‘हॅट्रिक’, महाराष्ट्रात बळ!

भाजप विजयाचा महायुतीला फायद्याची शक्यता-हेमंत पाटील

पक्ष तसेच सत्तेविरोधात असलेले वातावरण, मतदानोत्त चाचण्याचा भाजप विरोधातील कल आणि राजकीय विश्लेषकांची भाकिते खोटी ठरवत भाजपने हरियाणात सत्तेची ‘हट्रिक’ लगावली आहे. भाजपच्या या विजयामुळे महाराष्ट्रात महायुतीला बळ मिळेल, असा अंदाज इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.८) वर्तवला.सत्तेविरोधातील लहर असतांना देखील भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, हे विशेष असल्याचे पाटील म्हणाले.

हरियाणात कॉंग्रेसला पोषक वातावरण असताना देखील पक्षाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.पक्षांतर्गत गटबाजी आणि अतिविश्वासाचा फटका पक्षाला बसला. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या ‘नरेटिव्हचा’ फायदा झाला होता. पंरतु,विधानसभा निवडणुकीत फायदा दिसून आला नाही. हरियाणा विधानसभा विजयाचा महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना बळ मिळेल, हे सत्य नाकारता येत नाही. महिन्याभरावर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारण्यास यामुळे मदत होईल,असे पाटील पुढे बोलतांना म्हणाले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मात्र महाविकास आघाडीच्या चिंतेत भर पडली आहे. एक दशक भराहून सत्तेत असतांना आणि सत्तेविरोधात लहर असतांना देखील या राज्यात भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. केंद्रशासित जम्मु—कश्मीर मधील निवडणुकीत देखील जम्मु क्षेत्रात भाजपची कामगिरी समाधानकारक दिसून आली आहे. अशात महाराष्ट्रातील राजकीय व्युहरचनेत बदल करण्याची वेळ मविआवर आली आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप निवडणुकीला समोर जाणार आहे. महायुतीचे घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्या सोबतच्या जागावाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाला आहे. विजयादशमी नंतर केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याची शक्यता आहे.

हरियाणातील या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रातील निवडणूक तयारीला वेग देणारा आहे. भाजप आणि संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक घरोघरी जावून पक्ष प्रचाराला लागले आहेत. संघाची मदत भाजपला मिळत आहे. उलटपक्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाने देखील तयारींना वेग दिला आहे. मविआचे अनेक मेळावे जिल्हानिहाय आणि क्षेत्रनिहाय घेतले जात आहे.सत्ताधार्यांविरोधात लहर थोपवता येवू शकते, याचे उत्तम उदाहरण हरियाणातील विजयाने भाजपने दाखवून दिले आहे.अशात त्याचा व्युहरचनेचा वापर राज्यात करण्याचा मानस भाजपचा असू शकतो, हे नाकारता येणार नाही, असे पाटील म्हणाले.