माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जिल्हयातील सात ग्रामपंचायतींना 2 कोटी 10 लक्षचे बक्षिस

माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जिल्हयातील सात ग्रामपंचायतींना

2 कोटी 10 लक्षचे बक्षिस

Ø मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले ग्रामपंचायतींचे अभिनंदन

Ø ग्रामपंचायत चिचबोडीला राज्यस्तरीय 50 लक्षाचे बक्षिस जाहीर

चंद्रपूर, दि. 28 : पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या निर्सगाच्या संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर, 2020 पासून राबविण्यास सुरुवात झाली. तर “माझी वसुंधरा अभियान 4.0” हे  स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 1 एप्रिल, 2023 ते 31 मे 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये राज्यातील 22218 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतलेला होता. यामध्ये जिल्ह्यातील 321 ग्रामपंचायतींचा समावेश होता. माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत उच्चत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची नावे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत घोषीत करण्यात आली असुन यामध्ये चंद्रपुर जिल्हयातील 7 ग्रामपंचायतींनी  राज्यस्तरावर तसेच विभाग स्तरावर उतुंग कामगिरी करत पुरस्कार प्राप्त केले आहे.

माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जिल्ह्यातील 7 ग्रामपंचायतींनी 2 कोटी 10 लक्ष किंमतीचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जिल्ह्याकरीता ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. याकरीता सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव व नागरीकांचे अभिनंदन करतो, तसेच अभियानासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं), गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे देखिल कौतुक करतो, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी म्हटले आहे.

पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या निर्सगाच्या संबंधित पंचतत्वांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटीबध्द असून त्याकरीता माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 टक्के ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये देखिल जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचातीकडुन पर्यावरण व निसर्गाच्या संवर्धनाकरीता आवश्यक पावले उचलले जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती

राज्यस्तरीय पुरस्कार : ग्रामपंचायत चिंचवडी, (तालुका सावली) 50 लक्ष रुपये बक्षीस.

विभागस्तरीय पुरस्कार : माजरी (तालुका भद्रावती) 50 लक्ष रुपये, नांदा  (तालुका कोरपना) 15 लक्ष रुपये,  पेटगाव (तालुका सिंदेवाही) 15 लक्ष रुपये, आनंदवन (तालुका वरोरा) 50 लक्ष रुपये, भेंडवी (तालुका राजुरा) 15 लक्ष रुपये आणि कुकुटसाथ (तालुका कोरपना) 15 लक्ष रुपये.