कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कलम 36 लागू

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कलम 36 लागू

चंद्रपूर, दि.15 : मोहरम हा उत्सव मुस्लीम धर्मीय व काही प्रमाणात हिंदु समाजातर्फे साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 16 व 17 जुलै रोजी मोठया प्रमाणात मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याने जिल्हयात  कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच आषाढी एकादशी निमित्त 18 जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ  लागू करण्यात आले आहे.

मुंबई पोलिस कायद्यान्वये खालील नमुद केल्याप्रमाणे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन,  मिरवणुक काढण्याबाबत व मिरवणकीचे मार्ग निश्चित करणेबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान केले आहे. मिरवणुक  व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे  वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  मिरवणुकीच रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानांचे जवळ लोकांचे वागणुकीबर निर्बंध  घालण्याचे अधिकार, लाऊडस्पिकर वाजविण्याबर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, कलम 33 ,35,37, ते 40,42,43, व 45 देण्यात आले आहेत.

सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुक वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणेअंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांचेपेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे. सदरआदेश 18 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमुद आहे.