तीन प्रकारच्या दत्तक  प्रक्रियेनी मिळू शकते आता पालक बनण्याची संधी

तीन प्रकारच्या दत्तक  प्रक्रियेनी मिळू शकते आता पालक बनण्याची संधी

चंद्रपूर, दि. 18 : पालकत्व ही प्रत्येक विवाहित व्यक्तीसाठी महत्वाची बाब आहे. पण काही प्रकरणात ती संधी न मिळाल्याने पालक बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र आता यावर शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली असून पालकत्व मिळण्याकरीता 1)अनाथ बालक दत्तक घेणे  2) नात्यातील बालक (रक्तातील नाती ) दत्तक  3) प्रतिपालकत्व दत्तक घेणे, हा पर्याय उपलब्ध झाला आहे.

अनाथ बालक दत्तक घेणे : यामध्ये अनाथ, परित्याग केलेले आणि सोडून दिलेल्या  बालकांचा समावेश होतो. अशा बालकांना बचाव जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून केला जातो व बाल कल्याण समिती चंद्रपुर, यांच्या आदेशाने किलबिल दत्तक योजना संस्थेमध्ये ठेवले जाते.  दत्तक इच्छुक पालकांनी CARA (CentralAdoption Resource Authority) नवी दिल्ली यांचे cara.wed.gov.in या संकेतस्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर बालकला दत्तक घेता येऊ शकते.

नात्या अंतर्गत  (रक्तातील नाती ) सावत्र दत्तक  : बाल न्याय बालकांची काळजी  आणि संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 2(52) नुसार  दत्तक जाणाऱ्या मुलाची काका-काकू, मामा-मामी, मावसा- मावशी, आजी –आजोबा आईकडील /वडीलाकडील हे नात्याअंतर्गत दत्तक घेण्यास पात्र असतात. सावत्र दत्तक यामध्ये पती/पत्नी सोबत घटस्फोट झाल्यास, तसेच पती/पत्नी यांचे मृत्यू झाल्यास जर व्यक्ति दुसरे लग्न करत असल्यास  व त्यांचे मुलं/मुली असतील, त्यामुलांना लग्न झालेल्या व्यक्तिचे नाव जोडण्याकरिता सावत्र दत्तक केल्या जाते. अशा दत्तक इच्छुक पालकांनी  सुध्दा CARA(CentralAdoption Resource Authority) नवी दिल्ली यांचे cara.wed.gov.in या संकेतस्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी करावी.

प्रतिपालकत्व दत्तक घेणे : काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके बाल कल्याण समिती चंद्रपूर यांच्या आदेशान्वये बालगृहात दाखल होतात. अशा बालकांचे पालन पोषण करण्यास असमर्थ ठरविले जाते किंवा बालकांना 6 महिनेपासून भेटायला आले नाही, अशा बालकांना प्रतिपालकत्व तत्वावर पालन पोषण करण्यास इच्छुक पालकांना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व कुटुंबाचे प्रेम मिळण्यासाठी देण्यात येते. यासाठी इच्छुक पालकांनी http//fe.wedcommpune.comadmin या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करावी. यानंतर  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित SFCAC (Sponcership and Fostercare Approval Committee) मार्फत पात्र ठरविले जाते व बालकल्याण समिती मार्फत बालकाचा ताबा एक वर्षाकरिता पालकन पोषण करण्यासाठी पात्र कुटुंबाकडे देण्यात येतो. बालकाचे नाव/ आडनाव बदलण्याचा अधिकार पात्र कुटुंबाला राहत नाही. दोन वर्षानंतर बालक जर त्या कुटुंबात रुळले व ते बाळ अनाथ असेल किंवा त्याला कोणीही  नाही, तर अशा बालकाला दत्तक घेण्याची प्रक्रिया पालक न्यायालयामार्फत करू शकतात.

वरील दत्तक प्रक्रिया व दत्तक प्रक्रियेकरिता नोंदणी विषयी जाणून घेण्याकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षला भेट देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.