जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता आराखडा सादर करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता आराखडा सादर करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

 जलयुक्त शिवाराची कामे ही पावसाळयापूर्वी करणे अपेक्षित असल्याने यावर्षी जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता तात्काळ आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, श्वेता बोड्डू,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्यासह दूरदृष्यप्रणाली द्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जलयुक्तची कामे पूर्ण करण्याकरीता अतिरिक्त निधीची मागणी करावी. प्रत्येक मागणीवर निधी वितरित केला जाईल. सन 2023 – 24 मधील दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार 100 % निधी वितरित करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी ची मागणी करण्यात यावी. जिल्हा नियोजन समिती मार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीसह विशेष निधीमधून मागणी प्रस्ताव सादर करावे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सन 2023-24 मधील प्रशासकीय मान्यता नुसार करण्यात येणारे कामे प्रत्यक्ष स्थळी भेटी देऊन पूर्ण करावी. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे करतांना कामाच्या आधारे निधी मागणी प्रस्ताव सादर करण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यतच्या कार्यपध्दतीची माहिती सर्वांना देण्यात यावी.

सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन बैठकी घेऊन जलयुक्त शिवारच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयात नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी व त्यांनी जलयुक्त शिवार कामाचा आठवडी अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे प्रत्येक सप्ताहास सादर करावा.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, निधी मागणी सादर करतांना कोणतेही त्रुटी येणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सदर निधी हा संबंधित लेखाशिर्षकांतर्गत असल्याचेी खात्री करावी. प्रशासकीय मान्यतेनुसार कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल. त्यामुळे सर्वांनी आपल्या अधिकारांतर्गत सर्व कामे पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. जेणेकरून चंद्रपूर जिल्हयातील जलयुक्त शिवाराच्या कामाचा वाढता आलेख विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करता येईल. कामे पूर्ण होताच त्याची जीओ टॅगींग सह इतर कागदपत्रानुसार होणारी अंतीम प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.