जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू
गडचिरोली जिल्ह्यात सि.पी.आय. (माओवादी) या नक्षल संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माहे फेब्रुवारी ते जून २०२४ या कालावधी दरम्यान टी.सी.ओ.सी. राबविण्यात येत असतो. यादरम्यान माओवाद्यांकडून हिंसक घटना, शासकीय कार्यालये, बांबु/बिट डीपो, दुरध्वनी टॉवर इत्यादींची जाळपोळ, भू- सुरुंग स्फोट घडवून आणणे, सुरक्षा दल/पोलीस पथक/पोलीस स्टेशनवर हल्ले करण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यावर अडथळे निर्माण करुन रहदारी बंद करणे, राजकीय व्यक्ती, शासकीय अधिकारी व पोलीसांना माहिती देणारे बातमीदार यांना लक्ष्य करणे इत्यादी कारवाया करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिनांक १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. दिनांक ०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आहे.
तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ०१.०५.२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १५.०५.२०२४ चे २४.०० वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) लागु करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक ०१.०५.२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १५.०५.२०२४ चे २४.०० वा. पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे.
शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक ०१.०५.२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १५.०५.२०२४ चे २४.०० वा. पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश दिनांक ०१.०५.२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १५.०५.२०२४ चे २४.०० वा. वाजेपावेतो संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.