स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात प्रत्येक गावात संवादकांच्या गृहभेटी 

शाश्वत स्वच्छतेसह अतिसार निर्मुलन करा – विवेक जॉनसन

स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात

प्रत्येक गावात संवादकांच्या गृहभेटी 

चंद्रपूर जिल्हात स्वच्छतेचे दोन रंग हिरवा ओला व सुका निळा  या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, सदर अभियान 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अभियान कालावधित जास्तीत जास्त गृहभेटी देवुन गावस्तरावर शाश्वत स्वच्छतेसह अतिसार निर्मुलन करण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

या अभियानाकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच संवादक यांची निवड करण्यात आली असून, यांचे पाणी व स्वच्छता या विषयावर प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण झालेले आहे. या प्रशिक्षित संवादका कडून जिल्ह्यातील प्रत्येक गावात गृहभेटी देण्याचे काम चालू आहे.अतिसार निर्मूलन, पाणी व स्वच्छता याची नीट काळजी घेणे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, स्त्रोतांची सुरक्षितता राखणे, मैला गाळ व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. घराघरातून निघणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण हे कुटुंब स्तरावरच व्हावे .याची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे ‌. यामध्ये हिरव्या रंगाची कचराकुंडी ही ओला कचऱ्यासाठी व निळा रंगाची कचराकुंडी ही सुक्या कचऱ्यासाठी अशा प्रकारचे दोन रंगाचे अभियान मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक गावात कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यासोबतच या अभियानात पावसाळ्यात उद्भवणारा अतिसार हा आजार कायमस्वरूपी कसा थांबवता येईल .याची काळजी कशी घ्यावी, गावात कुठल्या उपाययोजना कराव्या. याबाबत सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार गावात कार्यवाही चालू असून , गावागावात पाणी नमुन्याची तपासणी वेळेत केल्या जात आहे.  स्त्रोतांची स्वच्छता ठेवल्या जात आहे.

या मोहिमेत गाव स्तरावर गावचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छतागृही , जलसुरक्षक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून गावात सर्व दूर गृहभेटी देण्यात येत असुन, याद्वारे गावात शाश्वत स्वच्छते विषयी जनजागृती केल्या जात आहे. यामुळे गाव शाश्वत स्वच्छ राखण्यास मदत व गाव पातळीवर अतिसार सारख्या साथ रोगांचे निर्मूलन करण्यास  मदत होणार आहे. गाव स्तरावर चालू असलेल्या गृहभेटी मुळे शाश्वत स्वच्छता व अतिसार निर्मूलन याविषयी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यास मदत होत असून ,गृहभेट अभियान गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावे .याकरिता यंत्रणेतील सर्वांनी प्रयत्न करावे .असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.